स्वातंत्र्यसैनिक महादेव मिरगे यांचे वृध्दापकाळाने निधन
वेळापूर येथील स्वातंत्र्य सैनिक महादेव तुकाराम मिरगे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने बुधवार दि.१० ऑगस्ट रोजी निधन झाले.
मिरगे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पारे ता.खानापूर येथे ९ ऑगस्ट १९२२ रोजी झाला होता. १९३७ मध्ये त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या चळवळीत भाग घेतला होता. १९४२ मध्ये तासगांव च्या ऐतिहासिक मोर्चाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. पत्री सरकार चे महत्वाचे शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती. धुळे येथील डॉ. लिलाताई पाटील यांना ब्रिटिश काळात साडे सात वर्षांचा तुरुंगवास झाला होता. त्यांची येरवडा जेलमधून सुटका करण्यात महादेव मिरगे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जी. डी. लाड, रावसाहेब खडके यांच्या मदतीने डॉ. पाटील यांना कुंडल येथे नेउन पत्री सरकार मध्ये सहभागी करून घेण्यातही मिरगे यांचा मोलाचा वाटा होता.
ब्रिटिश सरकार विरूध्द लढा देण्यासाठी गोव्यामधून १९४६ मध्ये नागनाथअण्णा नाईकवडी, महादेव मिरगे, जी. डी.लाड यांनी शस्त्रसाठा आणला. मराठवाडा मुक्तीसंग्राम मध्येही ते अग्रभागी राहिले. रजाकारच्या लढ्यात तुफानी सेनादलाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर १९६८ रोजी मिरगे यांना सन्मानपत्र देण्यात आले होते तर १५ ऑगस्ट १९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
No comments