सोलापूर । बहुभूधारक शेतक-यांना ज्वारी देण्याचे आवाहन
संचारबंदीच्या कालावधीत अडकलेले मजूर आणि निराधार लोकांना
अन्न पुरवठा करता यावा यासाठी जिल्ह्यातील बहुभूधारक शेतक-यांनी त्यांच्याकडील अतिरिक्त ज्वारी ग्रामस्तरीय समितीकडे दान द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब आणि गरजू व्यक्ती आहेत. या व्यक्तींना विविध स्वयंसेवी संस्थाकडून मदत पुरविण्याचे काम सुरु आहे. मात्र त्यावर काही मर्यादा येत आहेत. म्हणून बहुभूधारक शेतक-यांनी त्यांच्याकडील अतिरिक्त ज्वारी ग्रामस्तरीय समितीला द्यावी. ग्रामस्तरीय समिती सदरची ज्वारी एकत्रीत करुन तहसिलदारांकडे जमा करतील. ही सर्व ज्वारी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे जमा करावी, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व तहसिलदार आणि तालुका कृषि अधिकारी यांना कळविले आहे.
58 निवारा शिबीरात 7024 नागरिक
लॉकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या स्थलांतरीत मजूरांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून 58 निवारा शिबीरे सुरु केली असून या शिबीरात 7024 नागरिक आहेत. जिल्ह्यात आज 2451 अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. तर तयार अन्नाचे 8331 पाकीटे वितरित करण्यात आलीत. यामध्ये अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 5195 पाकीटे वितरित करण्यात आली. शहरात 548 अन्न धान्यांचे किट तर 8394 तयार अन्नाचे पाकीटे वाटण्यात आले.
No comments